पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !   

लाहोरमध्ये दहशतवादी, राजकीय नेते एकाच व्यासपीठावर

इस्लामाबाद: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने लाहोर येथील एका मेळाव्यात भारताविरोधात  गरळ ओकली आहे. या वेळी व्यासपीठावर दहशतवाद्यांसोबत पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान, मलिक राशिद खान, सैफुल्लाह खालिद  आणि अन्य ज्येष्ठ राजकारणी उपस्थित होते.मेळाव्यात तल्हाने स्वतःची ओळख हाफिज सईदचा प्रतिनिधी म्हणून करून दिली. भारताने आमचे पाणी रोखले आहे. त्यामुळे भारताचा गळा दाबू, अशी धमकी त्याने दिली.  
 
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षानंतर २८ मे रोजी मेळावा आयोजित केला होता..  मेळाव्यात राजकीय नेते उपस्थित असल्याने  दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारचा आश्रय मिळत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. विविध दहशतवादी गट, सैन्यातील व्यक्ती आणि राजकीय मंडळी उपस्थित होती. सर्वजण एकाच व्यासपीठावर दिसले. या वेळी हाफीज सईद आणि फील्डमार्शल असिम मुनीर यांचे पोस्टर लावले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करुन ते नष्ट केले होते. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे ते बालेकिल्ले होते. त्यामुळे दहशतवादी संतप्त झाले आणि त्यांनी भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी मेळावा घेतला होता.
 
दहशतवाद्यांच्या अनेक चित्रफिती 
 
पाकिस्तानातील गुजरांवाला येथून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मुझम्मिल हाझमीची एक चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली त्याने दिली.  तसेच भारतात हिंसाचार केला जाईल, अशी तो धमकी त्यात देत असल्याचे दिसले. बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात या गटाची भूमिका होती, असा दावाही हाझमी याने केला.

Related Articles